Maharashtra Havaman Andaj: महाराष्ट्राच्या वातावरणात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे अंगाची लाहीलाही करणाऱ्या 40 अंश तापमानाची झळ, तर दुसरीकडे मे महिन्याच्या तोंडावरच अवकाळीचा अडथळा. आकाशात वादळाची चाहूल लागलीय. वाऱ्यांचं चक्र फिरलंय आणि हवामान विभागानं थेट यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. म्हणजेच, पुन्हा गारपिटीचा धोका आहे… आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या माथी काळजी.
अरबी समुद्रातून प्रचंड बाष्प राज्याच्या दिशेनं सरकत आहे. त्याचवेळी गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली असून तिचा परिणाम महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसू लागलाय. परिणामी राज्यातील वातावरणात अचानक बदल झाला असून पुढील पाच दिवस हवामानात अस्थिरता राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिलाय. Maharashtra Havaman Andaj
राज्यातील या 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट:
ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी थेट ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय, बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता उर्वरित राज्यभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यालाही सावधानतेचा इशारा
पुणे शहरात ढगाळ वातावरण तयार झालं असून मंगळवारपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्याफारक्याने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलाय. तापमानात सरासरी 2 अंशांची घसरण झालेली आहे.
विदर्भात गारपीटीची शक्यता, उन्हाळी पिकांचं संकट
विदर्भामध्ये आता गारपिटीचं नवीन संकट घोंगावतंय. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेलेलं असून, अवकाळीमुळे तापमानात काहीशी घट होणार आहे. मात्र, या गारपीटीचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना बसू शकतो.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात रविवारी पडलेल्या गारपिटीमुळे पपई, केळी, तीळ, भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पवनार, सुरगाव, कान्हापूर, रेहकी या गावांमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळीने हादरवून सोडलं.
पुढचे तीन दिवस विशेष सावधगिरी आवश्यक
राज्यात सोमवार ते गुरुवार या कालावधीत बहुतेक भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि अचानक होणारी गारपीट यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनीही पिकांना योग्य प्रकारे झाकावं, पाण्याचा निचरा योग्य होईल याची खबरदारी घ्यावी.
शेवटी एकच विनंती – पाऊस येईल, जाईल… पण काळजी घ्या!
असंच अवकाळीचं संकट येत राहिलं तर शेतकऱ्यांचं गणित कोलमडणार हे नक्की. त्यामुळे हवामान विभागाचे अलर्ट लक्षात घेऊन योग्य ती पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही थंडी-उष्णतेचा हेका लागल्याने सर्दी, ताप, घशात खवखव, दम्याचे त्रास वाढू शकतात. वडीलधाऱ्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी.
हे पण वाचा | पंजाबराव डख: राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार! राज्यात या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता..