Marathwada unseasonal Rain : मराठवाडा पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी आणि जालना जिल्ह्यात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. या नैसर्गिक संकटात तिघा शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गारांचा मारा इतका प्रचंड होता की अनेक भागात शेतातील पिकांचं तर वाटोळंच झालं, पण गोठ्यांवर विजा कोसळून जनावरांचाही जीव गेला. आता पुढील दोन दिवस असाच पाऊस आणि वादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. Marathwada unseasonal Rain
एका बाजूला उन्हाळ्याची चाहूल लागलेली, शेतकऱ्यांनी कांदा, भाजीपाला, फळबागा यांचा साठा करून बाजारात पाठवण्याची तयारी केली होती. पण त्या साऱ्या मेहनतीवर गारपिटीने अक्षरशः पाणी फेरलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील कोडापूर गावात २२ वर्षांचा अशोक म्हस्के हा तरुण शेतकरी विजेच्या धक्क्याने जागीच गेला. तो आपल्या शेतात काम करत होता. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी गावात सचिन मगर (३५) आणि वडवणी तालुक्यात अभिमन्यू नलभे (३६) यांचा सुद्धा वीज पडून मृत्यू झाला. एका दिवसात तिघेही कुटुंबांचे आधारवड हरपले.
विजेचा कहर फक्त माणसांपुरताच नाही राहिला. जालना जिल्ह्यात परतूर येथे शेख मुख्तार कुरेशी यांचा बैल विजेच्या झटक्याने दगावला. परभणी जिल्ह्यात कोरवाडी येथील समाधान कोंडाळ यांच्या गोठ्यावर वीज कोसळून एक गाय आणि वासरू जागीच मृत झाले. ही दृश्यं पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूच आले.
खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, पैठण – या भागात माणसांनी धावपळ केली. लग्नसराईच्या हंगामात खुलताबाद तालुक्यात एका लग्नात वाऱ्याने मांडव उडवून दिला. संपूर्ण गोंधळ उडाला. वैजापूरच्या परसोडा गावात कांद्यावर झाकण टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी जीवाचं रान केलं. गंगापूरच्या लासूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या धान्याच्या पोत्यांवर पाऊस कोसळला. सगळं भिजून गेलं. मेहनतीचं सोनं करायचं होतं, पण तेच आता नुकसानात गेलं.
लातूर जिल्ह्याचा रेणापूर तालुका, लातूर शहर, तसेच बीडचा केज तालुका – या भागांमध्येही गारांसह पावसाने झोडपलं. विजेच्या कडकडाटाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. ढगाळ वातावरण, गारांचा मारा, पावसाचा सळसळाट याने संपूर्ण मराठवाडा हादरून गेला.
हवामान खात्याचा अंदाज भयावह आहे. पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी, शेतीसाठवण सुरक्षित ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे.
शेवटी प्रश्न राहतो, निसर्गाचा कोप किती दिवस चालणार? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार?
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मेसेज! या तारखेपासून होणार अवकाळी पाऊस