Maharashtra Weather Update | सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेखाली होरपळतोय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचलंय. विशेषतः चंद्रपूरमध्ये आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं असून, हे महाराष्ट्रातील आजचं सर्वाधिक तापमान ठरलंय. ही स्थिती पाहता, पुढील काही दिवस तरी उष्णतेपासून सुटका होणार नाही, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. Maharashtra Weather Update
तापमानाचा झपाट्याने वाढता आलेख
आज राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेलं तापमान पाहिलं तर, मुंबईत ३३ अंशांच्या पुढे पारा गेला, तर पुण्यात ३८.७ अंश, सातारा ३९.९, सोलापूर ४३ अंश, अकोला ४४.३, अमरावती ४४.४, यवतमाळ ४३.६, नागपूर ४४, आणि चंद्रपूर ४४.६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलं. कोकणात उकाडा वाढला असून, ठाणे ३६.२, पालघर ३५.२, रत्नागिरी ३३.४ अंश तापमान नोंदलं गेलं.
पावसाची शक्यता कुठे?
या झळा देणाऱ्या उन्हात थोडासा दिलासा काही जिल्ह्यांना मिळण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच नांदेड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्येही हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उष्णतेचे यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी?
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या भागांमध्ये दमट आणि उष्ण हवामानाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती – या भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.
अजून किती दिवस सहन करावी लागणार ही लाट?
हवामान तज्ञांच्या मते, यंदा एप्रिल ते जून महिन्यापर्यंत उष्णतेच्या लाटा वारंवार जाणवणार आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ४३ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहील. कोकण विभागातही तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात ७२ तास स्थिर स्थिती राहील, मात्र नंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
काय करावं?
- उन्हाळ्यातील ही भीषण लाट पाहता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा.
- भरपूर पाणी प्या, ओले कपडे किंवा टॉवेल अंगावर ठेवा.
- उन्हाळी आहार – ताक, फळं, पाणी यांचा वापर वाढवा. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना उष्णतेपासून विशेष संरक्षण द्या.
निसर्गाच्या कडाक्यापुढे माणूस हतबल असतो, पण खबरदारीने आपल्याला त्रास टाळता येतो. हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या आणि स्वतःची काळजी घ्या!