Non AC Vande Bharat Express | रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता लवकरच ‘अमृत भारत एक्सप्रेस’ म्हणजेच नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. आगामी काही दिवसांत ही ट्रेन मुंबईहून बिहारकडे धावणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता असून तिचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. Non AC Vande Bharat Express
कुठे धावणार अमृत भारत एक्सप्रेस?
ही नवी सुपरफास्ट ट्रेन मुंबई ते सहरसा (बिहार) या मार्गावर धावणार आहे. या गाडीमुळे मुंबईहून बिहारकडे आणि बिहारहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वीही बिहारमध्ये अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात झाली असून दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) दरम्यान ही सेवा सध्या सुरू आहे. मुंबई-सहरसा ही दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे.
अमृत भारत एक्सप्रेस म्हणजे काय?
ही ट्रेन ‘नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस’ म्हणूनही ओळखली जाते. ती पूर्णतः नॉन एसी स्लीपर डब्यांची असून स्वस्त प्रवासासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय प्रवाशांसाठीही जलद प्रवास शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि प्रवाशांच्या सोयींसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
बिहारसाठी रेल्वेचा मोठा प्लॅन
रेल्वेने बिहारमध्ये पुढील ६ महिन्यांत एकूण ६ नवीन ट्रेन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वंदे भारत, अमृत भारत एक्सप्रेससह दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांशी जोडणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ही महत्त्वाची घोषणा केली असून बिहारमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर दिला जात आहे.
पुण्यालाही नवीन ट्रेन मिळणार
मुंबईप्रमाणेच पुण्यातील प्रवाशांनाही लवकरच नवीन ट्रेन सेवा मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बिहार दरम्यान सुपरफास्ट ट्रेन सुरु करण्यासाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. याशिवाय पटना ते दिल्ली दरम्यान स्लीपर वंदे भारत ट्रेनही लवकरच धावण्याची शक्यता आहे.
ट्रेन सेवांचा शुभारंभ निवडणूकपूर्व?
२०२५ च्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात मतदान होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वे विभाग निवडणुकीपूर्वी नव्या ट्रेनसेवा सुरू करून प्रवाशांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. अमृत भारत एक्सप्रेस ही त्याचाच एक भाग असल्याचे जाणकार सांगतात.
मुंबई व पुण्यातून बिहारसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर आता जलद, सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाची नवी शक्यता तयार होत आहे. ‘अमृत भारत एक्सप्रेस’सारख्या ट्रेन सेवेमुळे हजारो प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून यामुळे भारतीय रेल्वेची कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे.