Monsoon 2025 : गेल्या पन्नास दिवसांपासून उकाड्याने जीव हैराण करून टाकला आहे. उन्हाळ्याच्या या झळा एवढ्या तीव्र होत्या की, अगदी झाडांचीही पाने सुकून कोमेजून गेली. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचं संकट गडद झालंय, तर काही ठिकाणी वीज भारनियमन सुरू झालंय. अशा परिस्थितीत सगळ्यांचं लक्ष आता एकाच गोष्टीकडे लागलंय यंदा पावसाचं काय? Monsoon 2025
हवामान खात्याकडून नुकतीच एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठल्याने समुद्राचं पाणी प्रचंड गरम झालं आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. याचा थेट परिणाम म्हणजे संपूर्ण देशभर बाष्पयुक्त ढगांची रचना होत चालली आहे. म्हणजेच, मान्सूनची तयारी सुरू झालेली आहे!
अंदमानमध्ये सुरुवात, केरळमध्ये ३० मे ते १ जून दरम्यान आगमनाची शक्यता
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, २० मेच्या सुमारास मान्सून अंदमानच्या सागरात दाखल होईल. हीच मान्सूनची पहिली पायरी असते. त्यानंतर तो हळूहळू भारताच्या मुख्य भूमीकडे सरकत येतो. केरळमध्ये ३० मे ते १ जूनदरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान मान्सून महाराष्ट्राच्या दिशेनंही आगेकूच करेल.
हवेचा दाब आणि वाऱ्यांचा वेग पावसाला पूरक
सध्या समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असून जमिनीवर कमी आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेनं गार वाऱ्यांची सुरुवात झाली आहे. हे वारे पावसाला पोषक ठरत असून गेल्या २४ तासांत देशभरात तापमानात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे पहाटे-पहाटे थोडी गार हवा जाणवते आहे. हीच चिन्हं सांगतात की, पावसाची चाहूल लागली आहे.
‘एप्रिल हिट’मुळे यंदाचा पाऊस वेळेवर किंबहुना लवकरच
गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की पावसाचा सुरुवातीचा जोर कमी होत चाललाय. पण यंदा मात्र वेगळं चित्र दिसतंय. एप्रिलमध्ये पडलेली उष्णतेची लाट म्हणजे ‘एप्रिल हिट’ एवढी तीव्र होती की, तिने मान्सूनच्या तयारीची प्रक्रिया गतीमान केली. त्यामुळे यंदा मान्सून वेळेवरच नाही, तर काहीशी लवकरच पोहोचण्याची चिन्हं आहेत. ही बाब शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा पण तयारी गरजेची
शेती हाच महाराष्ट्राचा कणा आहे. आणि या कण्याला बळ देतो पाऊस. यंदा पाऊस वेळेवर येणार, हे ऐकून अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पण यंदाच्या पावसाचं स्वरूप कसं असेल, ते नियमित असेल का, मुसळधार का, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पावसाचा अचूक वेध घेणं कठीणच असतं.
गावागावात चर्चा सुरू “या वर्षी वेळेवर येईल बहुतेक पाऊस…”
सध्या गावात पोतराजाच्या गजरापासून ते पेरणीच्या तयारीच्या गप्पांपर्यंत सगळीकडे एकच चर्चा – पाऊस कधी येणार? “या वर्षी वेळेवर येईल बहुतेक…” असं म्हटलं जातंय. यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं दिलाय.
हे पण वाचा | पंजाबराव डख: राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार! राज्यात या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता..